केंद्रातील भाजप सरकारने कोश्यारींच्या रुपात महाराष्ट्राची बदनामी करणारा माणूस पाठवला - शिवसेने उपनेत्या सुषमा अंधारे

केंद्रातील भाजप सरकारने कोश्यारींच्या रुपात महाराष्ट्राची बदनामी करणारा माणूस पाठवला - शिवसेने उपनेत्या सुषमा अंधारे

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.  पंढरी नगरी न्यूज) : भगतसिंह कोश्यारी यांनी वेळोवेळी महाराष्ट्राला कमी लेखण्याचेच काम केले आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्राची बदमानी करणारा माणूस पाठवला आहे. आम्हाला राज्यपाल हवे आहेत, भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ता नको, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात  भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जुन्या पिढीचे आदर्श होते, आता बाबासाहेब आंबेडकर ते नितीन गडकरी आदर्श आहेत असा उल्लेख केला. याच संदर्भात सुषमा अंधारे शनिवारी (१९ नोव्हेंबर) पत्रकारांशी बोलत होत्या. राज्यपालांनी पालक म्हणून काम केले पाहीजे, पण ते सातत्याने वादग्रस्त विधाने करीत आहेत. महाराष्ट्राला कमी लेखण्याचे काम त्यांनी केले आहे. महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल देखील त्यांनी असेच विधान केले आहे.

केंद्र शासनाने कोश्यारी यांच्या रुपाने महाराष्ट्राची बदनामी करणारा माणूस पाठवला आहे. आम्हाला राज्यपाल हवेत, भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ता नको. अंधारे यांनी पैठणला अंधारात भाषण केले, त्यामुळे त्यांना पैठणचा विकास दिसला नाही अशी टीका रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी केली. या संदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या, भुमरे यांनी पैठणमध्ये लाईटच लावले नाही, मग प्रकाश कसा पडणार, त्यामुळे मी अंधारात आले आणि अंधारातच भाषण करावे लागले.

पैठणच्या विकासाबद्दल आमच्याकडे पन्नास निवेदने आली आहेत, त्यात भाजपचे देखील निवेदन आहे. दक्षीण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणमध्ये मुतारी देखील नाही. पैठणला काहीच विकासाची कामे झालेली नाहीत. विकासाची कामे झाली आहेत असे भुमरे यांना वाटत असेल तर त्यांनी ते दाखवून द्यावे. पैठणची मते घेवून रावसाहेब दानवे खासदार झाले, पण त्यांनी देखील पैठणच्या विकासाकडे लक्ष दिले नाही, पैठणला त्यांनी नेहमी चकवाच दिला आहे. पण त्यांच्याबद्दल आम्ही बोलणार नाही.

भुमरे यांची पैठणमध्ये दारुची नऊ दुकाने आहेत, दारुची दुकाने उघडण्यात व्यस्त असलेले भुमरे पैठणचा विकास कधी करणार? असा टोला देखील अंधारे यांनी यावेळी लगावला. दारुची दुकाने टाकण्याची पात्रता लक्षात घेवून शिंदे-फडणवीस यांनी त्यांना मंत्री केले का? असा सवालही अंधारे यांनी केला.