वाळूतस्कर झाले मजोर, वाळूच्या उपशासाठी गुरसाळे बंधाऱ्याचे दरवाजे काढल्याने आठ गावांवर जलसंकट

वाळूतस्कर झाले मजोर, वाळूच्या उपशासाठी गुरसाळे बंधाऱ्याचे दरवाजे काढल्याने आठ गावांवर जलसंकट

---------------------------------------------------------------------------------
प्रशासनाचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर पाण्या अभावी होणाऱ्या शेतीच्या नुकसानीला जबाबदार कोण ?
---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर(दै.पंढरी नगरी न्यूज) : भीमा नदीवरील गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे दरवाजे वाळू तस्करांनी काढल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. परिणामी भीमा नदी कोरडी पडण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे तालुक्यातील आठ गावचा शेतीच्या पाण्याचा तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उजनी धरणातून सोलापूर शहर तसेच नदीकाठच्या गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी एक आवर्तन सोडण्यात आले होते. पाणी सोलापूर मध्ये पोहोचल्यानंतर म्हणजे मागील पंधरा दिवसापूर्वी हे आवर्तन बंद करण्यात आले.

तत्पूर्वी प्रशासनाने गुरसाळे बंधाऱ्यात साडे तीन मीटर पाणी पातळी ठेऊन दरवाजे टाकले होते. मात्र मागील आठवड्यात अचानकपणे सलग तीन वेळा बंधाऱ्याच्या तळातील दरवाजा लिकेज होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. हे लिकेज झाले की वाळू तस्करांनी दरवाजा काढून टाकला, याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीही माहिती नाही. मात्र वाळू तस्करांनीच हे दरवाजे काढले असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

वाळू तस्करांनी बंधाऱ्याचे दरवाजे काढल्याने या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या गुरसाळे, होळे, कौठाळी, शिरढोण, खेडभाळवणी, खेडभोसे, देवडे आणि शेळवे या आठ गावच्या शेतीचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

वाढलेले तापमान, पाण्याचा उपसा यामुळे दररोज ५  सेमीने नदीतील पाणी पातळी कमी होत आहे.  सध्या देवडे आणि खेडभोसे येथील नदीपात्र पूर्णपणे उघडे पडले आहे. नदीपात्रातील खड्ड्यांमध्येच पाणी साचलेले दिसून येत आहे.

फेब्रुवारी महिन्यामध्ये उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे, त्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे. अशावेळी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतातील उभी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

या बंधार्‍यावरच परिसरातील अनेक गावचा पाणीपुरवठा सुरू असतो मात्र वाळू तस्करांनी दरवाजा काढल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. यापुढील आवर्तन कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे या परिसरातील शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

याबाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई करून गुरसाळे बंधारा पूर्ण क्षमतेने भरून घ्यावा, अशी मागणी या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांमधून होत आहे.

( १) वाळू तस्करांनी वाळूच्या हव्यासापायी बंधाऱ्याचे दरवाजे काढून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलेले आहे. आगामी उन्हाळा आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने गुरसाळे बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त ठेवावा. खेडभोसे येथील भीमा नदी पात्र कोरडे पडले आहे. पाण्याअभावी शेतीचे झालेले नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने कालव्यातून कोकनदी मध्ये पाणी सोडून बंधारा भरून द्यावा.

-  बंडू पवार, चेअरमन कल्याणराव काळे विविध कार्यकारी सेवा सोसायटी, खेडभोसे

२) मागील चार दिवसापासून देवडे - शेळवे येथील भीमा नदी पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. सध्या नदीपात्रात खड्डा करून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर शेतातील उभे पिके जगवण्याचा आटापिटा सुरू आहे. प्रशासनाने गुरसाळे बंधाऱ्यात पाणी सोडून बंधारा भरून घ्यावा किंवा शेतीच्या होणाऱ्या  नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.

- पोपट पवार  खेड भोसे  शेतकरी

३) धरणातून पाणी सोडणे बंद झाल्यानंतर बंधाऱ्यात साडे तीन मीटर पाणी पातळी ठेवली होती, मात्र मागील आठवड्यात तळातील एक दरवाजा लिकेज झाला होता, त्याचे लीकेज लगेचच दुसऱ्या दिवशी काढण्यात आले, मात्र नंतर सलग २ दिवस दरवाजा लिकेज होत होता, तरीही आम्ही ताबडतोब गळती बंद केली. तरीही पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे. मात्र हे लिकेज कोणी मुद्दाम केले की कसे याबाबत काही सांगू शकत नाही.
- सोमशेखर हरसुरे, कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर)