मंगळवेढ्याची रिलस्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात आरोपीस अटक करण्यास पोलिसांची अक्षम्य टाळाटाळ, ◼️ कोल्हापूर विभागाचे पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून रोहिणी पाराध्ये हिस न्याय देण्याची होतेय मागणी..
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज) ब्रह्मपुरी येथील रिलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये (वय 25) हिच्या आत्महत्या प्रकरणात तिच्या पतीविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल होवून एक आठवडा उलटूनही तो आरोपी अद्यापही मोकाट असून पोलिसांनी सदर आरोपीस अटक न केल्यामुळे पोलिस खात्याच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे नुतन पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी या प्रकरणात गांभीर्यपुर्वक लक्ष घालून अटक करण्यास टाळाटाळ करणार्या सदर पोलिस अधिकार्यावर कारवाई करावी अशी मागणी रिलस्टारचे फालोअर्स व सुज्ञ नागरिकामधून आग्रहाने पुढे येत आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील मयत रिलस्टार रोहिणी पाराध्ये (वय 25) हिने दि.26 मे रोजी दुपारी 1.30 वाजता शेतातील निर्जनस्थळी असलेल्या एका हॉटेलमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची खबर पोलिसात तिच्या पतीने दिल्यावर मयत दाखल झाले होते. या घटनेबाबत आत्महत्या की तिला गळफास दिला याबाबत ब्रह्मपुरी परिसरातून उलटसुलट चर्चा होत आहे. सदर मयत रोहिणीची बॉडी वैद्यकीय तपासणी प्रसंगी ताटले असल्याचे कुटुंबियाकडून सांगण्यात आले. एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर 10 तासाच्या पुढे गेल्यानंतर शरीर ताटते असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. गळफास दुपारी 1.30 वाजता घेतल्यानंतर तीन ते चार तासात बॉडी कशी काय ताटली? हा एक संशोधनाचा विषय बनू पहात आहे. यावरून तिची आत्महत्या की गळफास दिला गेला? असा प्रश्न आता सगळीकडे उपस्थित होवून यावर चर्चा रंगत आहे. मयत रोहिणीच्या कुटुंबियाने मंगळवेढा पोलिस स्टेशन अधिकार्याना गुन्हा दाखल करण्याची वारंवार मागणी केल्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांना अखेर सोलापूरचे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे न्यायासाठी धाव घ्यावी लागली. तदनंतर पोलिस प्रशासनाने कसाबसा तरी गुन्हा दाखल करून घेतला मात्र आरोपीला आम्ही अटक करणार नाही, त्यांच्याविरूद्ध सबळ पुरावा नाही असा पवित्रा पोलिस प्रशासनाने घेतल्यामुळे मयत रोहिणीला खरा न्याय मिळणार की नाही यावर सध्या प्रश्नचिन्ह उभा आहे. सदरच्या घटनेवरून मंगळवेढा पोलिस ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्याबाजूने उभे राहतात की आरोपीच्या बाजूने यावर नागरिकामधून तर्कवितर्क काढले जात आहेत. पोलिसानी नेहमी अन्याय झालेल्या व्यक्तीच्या बाजूने उभे राहिले पाहिजे असा सर्वसाधारणपणे नियम असताना येथे हा नियम गुंडाळून ठेवला जात असल्याने गोरगरीबांना व पिडीतांना न्याय मिळेल की नाही याबाबत नागरिकामधून प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर मयताच्या कुटुंबियाना पुरावा नसल्याने हे प्रकरण न्यायालयात टिकेल की नाही? असा प्रश्नाचा भडीमार करून पोलिस प्रशासन कारवाई करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा व जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी या प्रकरणात गांभीर्यपुर्वक लक्ष घालून रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात आरोपीला अटक करून तिला न्याय मिळवून दिला तर तिच्या आत्म्याला खरी शांती लाभेल व खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य व सुज्ञ नागरिकामधून, रिलस्टार फालोअर्समधून व्यक्त होत आहेत.
रोहिणी पाराध्ये हिच्या पती विरूद्ध 18 जून रोजी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अद्यापही आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ केली आहे. आरोपीला अटक न केल्यास आम्हाला नाईलाजाने महिला आयोग व पोलिस प्राधिकरणाकडे तक्रार करावी लागेल.
- दिनकर मोरे, मयताचा मामा, ब्रह्मपुरी