साखर कारखानदार ऊस वजनात काटामारी करतात माजी खा. राजू शेट्टी यांची माहिती..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर : महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने खासगीकरण करण्याचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टींनी साखर कारखानदार ऊस वजनात काटा मारून दरवर्षी ४५०० कोटी रुपयांवर कसा डल्ला मारतात, याचा गंभीर आरोप करून कहाणीच सांगितली आहे.पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वजनकाटा सुरू केला आहे. उद्घाटनाला आले असता राजू शेट्टी पत्रकारांशी बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले महाराष्ट्रात यावर्षी सुमारे १९६ कारखाने सुरू झाले आहेत. पण दरवर्षी किमान १ कोटी टनापेक्षा जास्त ऊसाची चोरी होते. त्यातून साखर कारखाने सुमारे ४५०० कोटी रूपयांचा डल्ला मारतात. त्यालाच चाप लावण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता प्रत्येक जिल्ह्यात साखर कारखान्यांच्या ठिकाणी वजन काटे बसवणार आहे. वास्तविक सर्व साखर कारखान्यांवर डिजिटल काटे बसवण्याचा निर्णय झाला आहे.
पण त्याचीअंमलबजावणी कारखानदार करीत नाहीत. त्यामुळे ऊसाच्या वजनाची काटामारी सुरूच राहते. आता शेतकऱ्यांनी आपला ऊस खाजगी काट्यावरून वजन करून कारखान्याला द्यावा. त्याला कोणी आक्षेप घेतल्यास स्वाभिमानीशी संपर्क साधावा.
महाराष्ट्रातील १२२ कारखान्यांनी अद्याप एफआरपी दिली नाही. एकरकमी एफआरपीची राज्य सरकारने नुसती घोषणा केली आहे. मात्र त्यासाठी लागणारी ऊस दर नियंत्रण समितीच अजून राज्य सरकारने नेमली नाही. शिंदे फडणवीस हे सरकार फक्त घोषणाबाजी करणारे सरकार आहे.
जे सहकारी साखर कारखाने मोडून खाजगी केलेत ते पुन्हा शेतकऱ्यांना दिले पाहिजेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. याबाबत उच्य न्यायालयात माझी केसही आहे पण दुर्दैवाने अजून तिची सुनावणी होत नाही. त्यामुळे न्यायालये देखील आता तोंडे बघून केसेस घेतात का?, असा प्रश्न पडतो.