शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीक कर्जासाठी सिबिलची अट झाली रद्द ; सहकार आयुक्तांचे आदेश जारी, असा होणार याचा फायदा
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : महाराष्ट्रतील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता आता पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना सिबिल स्कोरची अट लागू राहणार नाही. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांकडून तसेच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वारंवार शासनाकडे पीक कर्जासाठी असलेली सिबिलची अट रद्द केली जावी या संदर्भात मागणी केली जात होती.
विशेष म्हणजे शासनाने या संदर्भात शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी हमी देखील दिली होती. मात्र शासनाने हमी दिल्यानंतरही अनेक बँका शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिल विचारत घेत होते. मात्र आता सहकार आयुक्तांकडून एक मोठा आदेश निर्गमित झाला आहे.
यामुळे यापुढे कोणतीच बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिलची अट लावणार नाही. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पाठवलेल्या एका पत्रात तत्सम आदेश दिले आहेत. या पत्रात नमूद केल आहे की, पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांनी 'सिबिल स्कोअर'चे बंधन घालू नये. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशात त्यासंबंधीचे कोणतेही निर्बंध नाहीत.
त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सिबिल स्कोअरची अट न लावता शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यात तीळमात्र देखील शंका नाही. वास्तविकता शेती हा सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. जर निसर्गाची कृपादृष्टी शेतकऱ्यांवर कायम राहिली वेळेवर पाऊस झाला, अतिवृष्टी झाली नाही, गारपीट झाली नाही, दुष्काळ पडला नाही, तर शेतीतून चांगली कमाई शेतकऱ्यांना होत असते.
यामुळे शेतकरी स्वतःचे पोट भरू शकतो आणि पुढील हंगामासाठी पीक पेरणी हेतू पैशांची सोय देखील करू शकतो. मात्र निसर्गाचे दुष्टचक्र हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठल आहे. शेतकरी बांधवांना कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी ढगाळ हवामान, कधी भीषण दुष्काळ यांसारख्या परिस्थितींचा मोठा फटका बसतो.
यामुळे पीक उत्पादनात घट होते. अनेकदा तर पेरलेल उगवतच नाही, जर उगवलंचं तर बाजारात शेतकऱ्यांच्या शेतमालाला अपेक्षित असा दर मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच कवडीमोल उत्पन्न मिळत असतं. परिणामी शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज घेऊन शेती करावी लागते. मात्र बँकेत पीक कर्ज घेण्यासाठी सिबिलची अट बंधनकारक करण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत होती.
खरं पाहता निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा शेतकऱ्यांना कवडीमोल उत्पन्न मिळतं यामुळे शेतकरी इच्छा असूनही कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नाही यामुळे अनेक शेतकऱ्यांचा सिबिल हा खराबच राहतो. परिणामी आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना सिबिल स्कोरमुळे पीक कर्ज उपलब्ध होत नव्हते. मात्र आता पीक कर्जासाठी सिबिलची अट काढून टाकण्यात आली असून सहकार आयुक्तांनी या संदर्भात राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला एक पत्र पाठवून आदेश दिले आहेत.