फलटण–पंढरपूर प्रस्तावित १०४ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गास स्थानिक रहिवाश्यांच्या प्रखर विरोध

फलटण–पंढरपूर प्रस्तावित १०४ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गास स्थानिक रहिवाश्यांच्या प्रखर विरोध

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) फलटण पंढरपूर प्रस्तावित १०४ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गाचे सुमारे प्राथमिक सर्वेक्षण ब्रिटिशकालीन काळात सुमारे १०२ वर्षांपूर्वी झाले होते. हा रेल्वेमार्ग घनदाट नागरी वस्तीमधून न नेता पंढरपूर शहराच्या बाहेरून, उपलब्ध मोकळ्या जागेतून वळविण्याची मागणी इसबावी-टाकळी-वाखरी येथील रहिवासी व प्लॉटधारकांनी केली आहे. सद्यस्थितीत फेरसर्वेक्षण सुरू असून याबाबत भूमिअभिलेख व महसूल कार्यालयांतून माहिती मिळत आहे.

दरम्यान, इसबावी-टाकळी येथील गट क्रमांक ३९, ४०, ५२, ५२ पै, ५३, ५६, ५६ पै, ५८, ५९, ६०, ६२, ६३, ६४, ७९, ८०, ८० पै, ४२०/६ , ४२१ गट वाखरी हद्द या भागात गेल्या पन्नास वर्षांपासून पिढीजात शेकडो कुटुंबे वास्तव्यास आहेत. या परिसरात घरे, अपार्टमेंट्स, शाळा-महाविद्यालये, व्यवसायिक आस्थापना, पेट्रोल पंप आदी पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या आहेत. रहिवाशांच्या मते, प्रस्तावित मार्ग जर याच नागरी भागातून गेला, तर शेकडो कुटुंबांचे विस्थापन, बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तसेच सामाजिक व आर्थिक अस्थिरता निर्माण होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला तीव्र विरोध असून विकासाला विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जुना शंभर वर्षांपूर्वीचा सर्वे घेऊन आज हजारो लोकांना बेघर करणे योग्य ठरणार नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

रहिवाशांनी पुढील तीन मुद्द्यांवर भर दिला आहे –

रेल्वे मार्ग नागरी वस्तीतून न नेता, शहराच्या परिघावरून पर्यायी मोकळ्या जागेतून वळवावा.

मागील दशकात रेल्वे प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणांचा पुनर्विचार करून, नागरी वस्ती बाधित न होणारे पर्याय स्वीकारावेत.

रहिवाशांच्या मतांचा विचार करून नव्या मार्गाचा आराखडा केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून निश्चित करावा.

या मागणीसाठी सर्व रहिवासी व प्लॉटधारकांच्या वतीने मा. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे, तसेच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील, मा. आमदार अभिजीत पाटील, मा. आमदार प्रशांत परिचारक, निवेदन सादर करण्यात आले असून तात्काळ कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी मा. नगरसेवक नवनाथ रानगट, सागर वाघमारे, बाळ कुंभार, श्याम तापडिया, भाऊसाहेब जगताप, युवराज मुळे, राजू वरपे व इतर उपस्थित होते.