चैत्र एकादशी : श्री विठ्ठलास पुरणपोळीचा महानैवेद्य, दर्शन रांगेत पुरेशा सोयी सुविधा;
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज) : चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा आज रविवार (दि. 29) रोजी लाखो वैष्णव भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा होत आहे. उन्हाचा पारा वाढलेला असतानाही भाविकांमध्ये उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. श्री विठुराया व रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत हजारो भाविक उभे असून ही रांग रिद्धी-सिद्धी पत्राशेडपर्यंत पोहोचली आहे. दर्शन रांगेतील भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे. याशिवाय दर्शन रांगेतील एक ही भाविक उपाशी राहू नये म्हणून पत्रा शेड येथे साबुदाण्याची खिचडी, मिनरल वॉटर, सकाळी चहा, दुपारी लिंबू सरबत व सायंकाळी पुन्हा चहा मोफत वाटप करण्यात येत आहे. दर्शन रांगेत चांगली स्वच्छता पायाला खडी टोचू नये म्हणून मॅट, शौचालय, दर्शन द्रुत गतीने चालून भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होण्यासाठी अनुभवी कमांडोची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होत आहे.
चैत्र शुद्ध एकादशीचा उपवास असतानाही श्री विठ्ठलास पारंपरिक पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही भक्तिभावाने जपली जात आहे. परंपरेनुसार, चैत्री एकादशीला भाविक पंढरीत श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुढे शिखर शिंगणापूर येथे जातात. तेथे भगवान शंकर व पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. या विवाह सोहळ्यास साक्षात श्री विठ्ठल उपस्थित राहून पंचपक्वान्नांचे भोजन केल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळेच श्री विठ्ठलास पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा प्रचलित असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.