ऊसतोड मुकादमांनी फसवणूक केल्यास तत्काळ गुन्हे : सहकार मंत्री - अतुल सावे

ऊसतोड मुकादमांनी फसवणूक केल्यास तत्काळ गुन्हे : सहकार मंत्री - अतुल सावे

--------------------------------------------------------------------------------

नागपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : ऊसतोड मजुरांचा पुरवठा करणाऱ्या काही मुकादमांकडून राज्यातील साखर कारखानदार आणि वाहतूकदारांची फसवणूक सुरू आहे.याप्रकरणी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाकडून मजूर पुरवठा करण्यासाठी तातडीने बैठक घेऊ. तसेच ज्या मुकादमांनी फसवणूक केली आहे, त्यांची माहिती मुंबई येथे घेण्यात येणाऱ्या बैठकीत द्यावी, त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार, संजय शिंदे यांच्यासह अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर अन्य सदस्य आक्रमक होत याप्रकरणी तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी घोषणा केली. ऊस तोडणी हंगाम सुरू होण्याआधी कारखानदार आणि वाहतूकदार मुकादकांकरवी तोडणी करार करतात. हे मुकादम लाखो रुपये घेतात आणि मजूर पुरवठा करत नाहीत. अनेकदा एका कारखान्यासोबत करार करतात आणि निम्म्यावर तोड ठेवून पुन्हा दुसऱ्या कारखान्याकडे जातात. त्यांना शोधून काढले असता त्यांच्या गावात जाणे मुश्कील होते, असा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर सावे म्हणाले, ''या हंगामात तीन फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. काही ठिकाणी मुकादमांनी मजूर दिले नसल्याने त्यांना जाब विचारला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत ही बाब खरी आहे.

आमदार हसन मुश्रीफ यांनी मजूर पळून जाण्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. मजूर पुरविण्याची जबाबदारी महामंडळाने घेतली पाहिजे,' अशी मागणीही त्यांनी केली. यावर सावे यांनी 'एकाच कारखान्याशी करार करावा, तो मुकादम अन्य कुठल्या कारखान्याशी करार करू शकणार नाही, अशा मुद्द्यावरच महामंडळाशी चर्चा करू, असे आश्वासन दिले.

संजय शिंदे यांनी, 'ऊस तोड मुकादम ही चोरांची टोळी आहे. सोलापूर जिल्ह्यात ३९ कोटी तर संपूर्ण जिल्ह्यात २०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. हे सराईत चोर झाले आहेत. त्यामुळे तत्काळ ज्या - त्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.