अवकाळी ने नुकसान झालेल्या पिकांचे व नुकसानग्रस्त घरांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश : आ - समाधान आवताडे
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज) : शनिवारी दि.२९ रोजी दुपारी ३ च्या सुमारास अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी, महमदाबाद(शे), गुंजेगाव सह अनेक परिसरात व पंढरपूर तालुक्यातील काही गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे या भागातील घरांचे लहान मोठ्या स्वरूपात नुकसान झाले आहे. एकाच वेळी सर्वत्र अवकाळी पाऊस न पडता विविध ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा बसत आहे. तरी या सर्व भागात प्रशासनाने पाहणी करून पंचनामे करावेत असे आदेश आ. समाधान आवताडे यांनी मंगळवेढाचे तहसीलदार मदन जाधव व पंढरपूर तहसीलदार बेलेकर यांना दिले आहेत.
शनिवारच्या वादळात महमदाबाद(शे) दहिवडी परिसरात अनेक घरांना याचा फटका बसला. महमदाबाद (शे) वाऱ्याने वीज कनेक्शनची वायर तुटून रामचंद्र म्हमाणे यांच्या दोन जर्शी कालवडी दगावल्या आहेत. दहिवडी येथेही पत्रे लागून जर्शी गाय जखमी झाल्या आहेत. अनेकांच्या घराचे पत्रे उडून संसार उघड्यावर आले आहेत. लवंगी परिसरात झाडे उन्मळून पडली आहेत .तसेच उचेठाण परिसरात हि विज पडून, जनावरांच्या अंगावर झाडे पडून जनावरेही जखमी झाली आहेत. द्राक्ष डाळिंब पपई यासह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विजेचे पोल पडून वीजपुरवठा खंडित झाला असून लक्ष्मी दहिवडी परिसरात २५ हुन अधिक विजेचे पोल पडले आहेत .तरी मतदारसंघातील सर्व गावात प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जाऊन नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तात्काळ करावेत असे आदेश आ समाधान आवताडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.