विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटलांना मातोळीचा गणपती पावणार का?
-----------------------------------------------------------------------------------
मातोळीच्या गणपतीचे आबानी घेतले दर्शन..
-----------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज ) : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून पंढरपूर- मंगळवेढा राजकीय वर्तुळात चर्चेत आलेल्या अभिजीत पाटलांचा राजकीय श्रीगणेशा झाला नसला तरी संक्रातीला तालुक्यात भरणाऱ्या मातोळी यात्रेतील गणपती दर्शनातून त्यांचा तालुक्यात राजकीय श्री गणेशा होणार का?याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयाने अभिजीत पाटील यांचा उदय झाला. विठ्ठल कारखान्याचा अध्यक्ष हा भविष्यातील पंढरपूरचा आमदार समजला जातो. पण पोटनिवडणुकीत विठ्ठल परिवाराचा निसटत्या मताने पराभव झाला. त्यामुळे भविष्यात विठ्ठल परिवाराकडे पंढरपूरची आमदारकी येणार का, याचीही चर्चा सुरू झाली आहे. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीबरोबर झालेल्या दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना संधी होती. पण त्यांनी दामाजीच्या निवडणुकीत सहभाग घेतला नाही. विठ्ठल कारखान्याच्या यशानंतर त्यांचा मंगळवेढ्यातील राजकीय राबता वाढेल असे बोलले जात होते. परंतु त्यांनी आपले राजकीय वलय वाढवण्याच्या दृष्टीने म्हणावे तितके लक्ष दिले नाही. नुकत्याच झालेल्या १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही स्वतःचा एखादा स्वतंत्र गट तयार होईल, अशा पद्धतीने त्यांनी देखील लक्ष दिले नाही. त्यामुळे पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात अभिजीत पाटलांकडे संभाव्य आमदार म्हणून पाहिले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांचा राजकीय गट वाढवण्याच्या दृष्टीने तितका प्रयत्न केलेला नाही.
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेचा विचार करता पंढरपूरच्या मतदारांबरोबर मंगळवेढ्यातील मतदारांचाही निर्णय मानला जातो. असे असतानाही त्यांनी मंगळवेढ्यातील गट वाढवण्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न केले नाहीत. तर मातोळी यात्रेसाठी त्यांनी गणपतीच्या दर्शनाला आ. समाधान आवताडे, भगीरथ भालके यांच्यानंतर उपस्थिती लावून मंगळवेढ्यातील नव्या वर्षात दर्शनाचा श्री गणेशा केला. पण तरीही आगामी काळात त्यांचा राजकीय श्री गणेशा होणार का, याची चर्चा तालुक्याच्या वर्तुळात सुरू झाले.
कारण येत्या काही महिन्यात तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका, जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका भाजप आ. समाधान आवताडे, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके, प्रशांत परिचारक या तिघांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्या तरी या निवडणुकीत अभिजीत पाटील किती गांभीर्याने घेतात. त्यावर त्यांचा मंगळवेढ्यातील राजकीय प्रवास अवलंबून आहे.