आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन...

आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन...

------------------------------------------------------------------------------------

आटपाडी (पंढरी नगरी न्यूज ) खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर  यांचे आकस्मित निधन झालेय. वयाच्या 74 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती.

शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली. त्यामुळे गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबतच होते. ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली, त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं.अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर चार वेळा आमदार झालेत. 1990, 1999, 2014, 2019 असे चार वेळा ते आमदार राहिलेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो.

दरम्यान, गेल्यावर्षी अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचं निधन झाले होते. सहा महिन्यानंतर अनिल बाबर यांचंही निधन झालेय. वर्षाच्या आत बाबर कुटुंबातील महत्वाच्या दोन सदस्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे.

आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे आजची मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खानापूर-आटपाटीला जाणार आहेत.

सांगली येथील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांचे आज आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिवसेना परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच ते चार वेळा आमदार असा त्यांचा अतिशय प्रेरणादायी प्रवास होता. रोखठोक भूमिका मांडणे यासाठी अनिल बाबर कायम ओळखले जायचे. आज त्याच्या जाण्याने खानापूर मतदारसंघासह राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण शिवसेना परिवार बाबर कुटुंबियांसोबत आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.